Saturday, October 2, 2021

"परदेशी भूमीवरील माहेरचा गणपती"__श्री. प्रशांत कुलकर्णी

 

"परदेशी भूमीवरील माहेरचा गणपती" अशी ज्याची ओळख आहे असा महाराष्ट्र मंडळ, अबुधाबीचा गणपती दोन वर्षांनी पुन्हा एकदा इंडिया सोशल सेन्टर च्या सभागृहात स्थापन झाला. गेल्या वर्षी कोरोनाच्या आगमनाने गणरायाचे आगमन सार्वजनिक न करता खाजगीरीत्या मंडळाला आयोजित करावे लागल्या मुळे सभासदांना दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. यावर्षी देखील गणराज च्या दर्शनाची आस मराठी मनाला लागली होती. इथल्या सरकारने कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि वॅक्सीनेशन च्या तिसऱ्या, चौथ्या डोस साठी स्थानिक रहिवाश्यांना उपलब्ध करून दिलेल्या सोयी यामुळे नियमात थोडी शिथिलता आली. मंडळाने इंडिया सोशल सेन्टर ला गणपती स्थापनेसाठी साद घातली आणि त्यांनीही येथील मिनिस्ट्री ऑफ इंटेरिअर यांच्याशी संवाद साधून काही अटींसह परवानगी मिळवली. सोशल डिस्टनसिंग, एकावेळी फक्त 20 भक्तांना दर्शनासाठी परवानगी आणि ७२ तास आधी केलेली पीसीआर टेस्ट, या अटी मान्य करण्यात आल्या आणि त्याची कडक अंमलबजावणीही करण्यात आली

          पण त्या आधी गेला महिनाभर, मंडळाची समिती, गणपती च्या आगमनाची तयारी करण्यात गुंतली होती. मंडळाच्या अध्यक्षा प्रिया पाकळे यांच्या संकल्पनेतून शनिवार वाडा ची प्रतिकृती उभारण्यात पूर्ण कमिटी कामाला लागली होती. अक्षय फणसे, यशश्री जोशी आणि सुवर्णा देशपांडे यांच्या कुशल कामगिरी ला सुशील गुरव, चिनार पाटील, अनिल पाकळे, दर्पण आणि पद्मिनी सावंत, प्रशांत मोहिते, सोनाली आणि ऊर्जा माजगावकर, सचिन अमृतकर, दीप्ती राव, निलेश आणि भूमिका उज्जैनकर, यांची साथ मिळाली आणि कल्पनेतील शनिवार वाडा मूर्त स्वरूपात तयार होऊ लागला. मंडळाचे विश्वस्त मंदार आपटे, प्रकाश पाटील आणि नरेंद्र कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व सचिव जितेंद्र बाचल यांच्यासह सर्वांची अथक मेहनत, अपार कष्ट घेऊन केलेला शनिवार वाडा जेव्हा उभा राहिला तेव्हा त्यातील मुख्य प्रवेश द्वारात उभी राहिलेली गणेश मूर्ती, दोन्ही बाजूचे बुरुज, त्यावर दिमाखात  फडकणारा भगवा, त्याच्या बाजूला तुतारी वाजवत उभे असलेला मर्द मराठा मावळे पेशवाई काळाची आठवण करून देत होता. दीप्ती आणि अजित राव यांनी गुरुजी नरेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली  प्राण प्रतिष्ठा केली. गणराया समोर स्मिता सरप यांनी काढलेली रांगोळी लक्ष वेधून घेत होती. संध्याकाळी भारतीय दूतावासातील पदाधिकारी, माननीय सभासद आणि प्रमुख उद्योग व्यावसायिक, देणगीदार यांच्या उपस्थितीत आरती पार पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी  अथर्वशीर्ष आणि संध्याकाळी विसर्जन साधेपणाने पण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत उत्साहाने पार पडले.

अखिल मानवजातीवर आलेले कोरोनाचे सावट हळूहळू दूर होत असताना गणरायाचे आगमन हे मनाला ऊर्जा देणारे, आत्मविश्वास वाढवणारे ठरले. विघ्नहर्ता गणराया या संकटावर मात करण्याची उमेद देत असतानाच पुढील वर्षी कोरोनाचे अस्तित्व च नसावे. म्हणजे पूर्वीसारखे, हे सारे नियम बाजूला सारून, बाप्पाचे स्वागत करण्याची मनोकामना प्रत्येकाने व्यक्त केली. बाप्पाच्या दर्शनासाठी कशाला हवेत नियम?

 

प्रशांत कुलकर्णी

अबुधाबी

No comments:

Post a Comment