Sunday, November 4, 2018

इम्परफेक्ट


इम्परफेक्ट

लेखक:                   संजय मांजरेकर 

प्रकाशक:               हार्पर स्पोर्ट

पाने:                       २१०

प्रकाशन:               सन २०१७ 

भाषा:                     इंग्रजी

संजय पुस्तकाची सुरुवात विस्फोटक विधानाने करतो. तो म्हणतो की जे लोक असे समजतात की मी क्रिकेटमध्ये माझ्या क्षमते इतके यश प्राप्त केले नाही त्यांना मी असे सांगू इच्छितो की जो माणूस खऱ्याअर्थाने क्रीडा क्षेत्रात बुडलेला नव्हता त्याच्यासाठी १०० हुन जास्ती आंतरराष्ट्रीय सामने खेळणे हे काही कमी यश नाही.

संजय सांगतो की त्याचे वडील, प्रतिथयश विजय मांजरेकर, हे निवृत्तीनंतर एक अस्वस्थ, निराश आणि रागीट माणूस बनले होते. क्रिकेटमधून निवृत्ती नंतरच्या आयुष्याशी त्यांना जमवून घेताच आले नाही आणि त्याचा घरादारावर परिणाम झाला.

मुंबई फलंदाजी पद्धती (स्कूल ऑफ बॅटिंग) चे तो खूप कौतुक करतो. एखाद्या मधील प्रतिभेला खत पाणी घालणे, टीका करणे, उत्तेजना देणे या मुंबईच्या विस्मयकारक क्रिकेट व्यवस्थेमध्ये योग्य व होतकरू क्रिकेटपटुंचा क्रिकेट मार्ग आखून दिला जायचा. परंतु या व्यवस्थेत फिटनेसला जितके महत्व द्यायला पाहिजे तितके दिले जात नाही. या फिटनेस बद्दलच्या उदासीनतेला तो स्वतः बऱ्याचदा धावचीत होण्यासाठी जबाबदार धरतो.

लेखक वेस्ट इंडिसच्या क्रिकेटपटूंचे कौतुक करतो कारण ते मैदानावर बडबड आणि शिवीगाळ करत नाहीत आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यातील प्रतिभेला प्रोत्साहन देतात. तो इम्रान खानची त्याच्यातील नेतृत्वगुणाबद्दल आणि चिडखोर पाकिस्तानी खेळाडूंना वेसण घालण्यात आलेल्या यशाबद्दल प्रशंसा करतो.

जलदगती गोलंदाजी आणि बाउन्सर खेळण्यात पटाईत असलेला संजय तीच गोलंदाजी खेळताना असुरक्षित कसा बनला याचे तो विश्लेषण करतो. तो हेही मान्य करतो की त्याच्या बचावात्मक फलंदाजीचा त्याला अभिमान होता आणि त्याने सक्रियपणे धावा बनवल्या नाहीत. जर बचावात्मक फलंदाजी करण्याबरोबर त्याने एकेरी धावा घेतल्या असत्या तर त्याच्या कारकिर्दीने कदाचित वेगळे वळणही घेतले असते. लेखकाच्या या प्रांजळपणाचे आश्चर्य वाटले ना?

त्याच्या म्हणण्या प्रमाणे प्रावीण्याने त्याला झपाटून टाकले होते. हा आणि गरज नसताना गोष्टी गुंतागुंतीच्या करण्याची सवय हे त्याचे दुर्गुण ठरले. त्याला असेही वाटते की जर आजच्या क्रिकेटपटूंसारखा त्याला वैयक्तिक प्रशिक्षक असता आणि जर त्याच्या कडे संजयला मन मोकळे करता आले असते तर त्याचा त्याला आणि त्याच्या कारकिर्दीला फायदा झाला असता.

मुंबई रणजी संघामध्ये संघभावना होती. मुंबईचे क्रिकेटपटु त्यावेळी एकमेकांना सांभाळून घ्यायचे. नेमकी याच गोष्टीची भारतीय संघात उणीव होती. भारतीय संघामध्ये त्यावेळी उत्तर आणि पश्चिम असे दोन प्रभावगट होते. स्टार खेळाडूंना संघामध्ये देखील विशेष वागणूक दिली जायची. त्याच्या म्हणण्या प्रमाणे अझहर हा विशाल हृदयाचा, मर्यादित कल्पनाशक्ती आणि नेतृत्वगुण असलेला नशीबवान माणूस होता. तो सचिन तेंडुलकर आणि मनोज प्रभाकर यांची खूप प्रशंसा करतो. पण तो हे देखील म्हणतो की प्रभाकर सगळ्यात महत्वाच्या कसोटीवर खरा उतरला नाही. सचोटीची कसोटी. त्याने संजयवर तेहेलकासाठी स्टिंग ऑपेरेशन करायचा फोल प्रयत्न केला.

समालोचक म्हणून काम करायला लागल्यावरच्या भागात तो डीन जोन्सच्या "टेरोरिस्ट" कांडाबद्दल लिहितो. त्याच बरोबर तो त्याच्या बरोबर काम केलेल्या इतर समालोचकांबद्दलही लिहितो.

या पुस्तकात काही गोष्टी वगळल्या आहेत आणि त्या प्रकर्षाने जाणवतात. मॅच फ़िक्सिन्ग बद्दल जवळजवळ काहीच लिहिलेले नाही. प्रभाकरने मॅच फ़िक्सिन्ग मध्ये कपिलचे नाव घेतले त्याबद्दल काही लिहिलेले नाही. गावस्कर आणि हर्षा भोगले यांचा उल्लेखही समालोचन विभागात नाही. त्याच्या कुटुंबाबद्दल (बायको आणि मुले) आणि त्यांच्यात असलेल्या नात्याबद्दल, त्याच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील त्यांच्या सहभागाबद्दल, स्थानाबद्दलही काही नाही.

आपल्याला माहिती आहे की संजय मांजरेकर हा परिपूर्णतावादी होता. त्यामुळे त्याच्या आत्मचरित्राचे नाव इम्परफेक्ट (अपरिपूर्ण) आहे याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मला असे वाटते की प्रावीण्याने पछाडलेला संजय आत्मटीका जरा जास्तीच करतो. परिपूर्णतेच्या मागे लागल्यामुळे तो सर्वंकष दृष्टिकोन गमावून बसला आणि त्याच्या क्षमतेइतके यश प्राप्त करू शकला नाही.

थोडक्यात हे पुस्तक म्हणजे त्याच्या कीर्तीचा उदय, प्रसिद्धीतील दिवस, प्रसिद्धी विलय, त्याच्या मनातील स्वतः विषयीच्या शंका, संघातून वगळल्याच्या यातना, लवकर निवृत्त होण्याचा निर्णय आणि समालोचक म्हणून त्याची दुसरी खेळी याचा प्रांजळ लेखाजोखा आहे.

मी चरित्र आणि आत्मचरित्राचा फारसा चहेता नाही. पण रविकिरणने (माझ्या चुलतभावाने) हे पुस्तक वाचायची जोरदार शिफारस केली आणि मी वाचावे म्हणून मला हे पुस्तक दिले देखील. पुस्तक वाचायचा निर्णय योग्य होता हे खचितच. पुस्तक छानच आहे.

मी हे पुस्तक का वाचले:     रवीकिरणची शिफारस      

काय आवडले नाही:             सुसूत्रतेचा अभाव

काय आवडले:                      प्रांजळपणा

शिफारस:                              तुम्हाला जर आत्मचरित्र आवडत असतील तर नक्की वाचा. आवडत नसतील तरी वाचा.

 

 
 

मंदार आपटे


 

Sunday, September 30, 2018

पावनी प्रसाद बारटके


पावनी प्रसाद बारटके




नियति

आज बऱ्याच दिवसांनी थोडी निवांत झाली होते , सहज मनात विचार येत होते ते आयुष्यातल्या वाटचालीचे, स्वतःचीच स्वतःला ओळख पटवून द्यायची व्यर्थ खटाटोप चालली होती . मनात विचारांचा काहूर माजला होता नि त्यातूनच जाणवत होते की किती कठीण आहे जगणे. अचानक मनाने ताबा घेतला तो भूतकाळाचा , त्या भूतकाळातल्या आठवणीतले एक व्यक्तिमत्व होते आमचे "दादाजी".   
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका अन त्या तालुक्यातील एक खेडेगाव शिरगाव. आज प्रतिशिर्डी म्हणून ते प्रसिद्ध आहे हे गाव . तळेगाव ( दाभोडे) कडे जाताना लागतो तो सोमावो फाटा , फाट्यावरून आत काही अंतरावं वसलेले हे एक गाव. माझ्या आठवणीतल्या आत्याचे गाव , अर्थात आता खूप काही बदलले आहे , पण माझ्या आठवणीत अजूनही जिवंत आहे ते सुमारे ३५ वर्षापूर्वीचे खेडे गाव , मातीचे रस्ते त्या रस्त्या वरून ये - जा करणाऱ्या बैल गाड्या , एखाद दुसरी दुचाकी गावात वीज नसल्यामुळे संध्याकाळ झाली की घरा घरात टिमटिम प्रकाश देणारे कंदील. सगळीच घरे कौलारू , जमिनी शेणाने सारवलेल्या.
पवणा नदीचा प्रवाह गावातूनच वाहत असे , नदीच्या काठापासून अगदी पन्नास पावलावर आत्याचं घर . चार गुंठ्यात बांधलेलं मातीच्या विटांचा ते कौलारू  घर , घरा समोर भली मोठी ओसरी , घराला लाकडी दरवाजे , त्यांना लोखंडी सळ्यांच्या कडया, आत भले मोठे दालन त्यातच दोन्ही बाजूला समोरासमोर मातीच्या पचण्या बनवून तयार केलेली माडी ; माडीत सामान ठेवलेले असायचे ते म्हणजे गुरांचा कडबा (चारा ) , शिवाय चूलीसाठी लागणारे सरपण ( झाडांच्या सुख्या फांद्या ) , शेणाने बनवलेल्या गवऱ्या .
दुसऱ्या दालनात प्रवेश केला की दिसायचे पितळेची चकाकणारी भांडी , मोठे मोठे हंडे , कळश्या . विशेष करून ह्या दालनाच्या एका भिंतीला लावलेली असायचे मातीच्या घागरीची चवडी , एकावर एक घागरिंचा थर अश्या सात ते आठ रांगा भिंती लगत असायच्या. एका बाजूला भला मोठा मातीचा पिंप , जे कणगी या नावाने प्रचलित आहे त्यात वर्षभराचे धान्य साठवले जाते.
दुसरे दालन ओलांडले कि तिसरे माजघर , तिथे एका कोपऱ्यात मांडलेली असायची मातीची चूल आणि चुलीच्या बाजूला काही अंतरावर न्हाणीघर (बाथरूम ) बाजूला लाकडी दरवाजा आणि त्या बाहेर भली मोठी पडवी , गुरांचा गोठा ( गाय , बैल , म्हैस इ. जनावरांची राहण्याची सोय )

एकत्र कुटुंब पध्दतीत साकारलेले हे घर लहानांन पासून ते थोरांपर्यंत २५ माणसांचे वास्तव्य आणि या सर्वांवर देखरेख करणारी एकच व्यक्ती आणि ती म्हणजे माझ्या आत्याचे यजमान "दादाजी ". साधारण पासष्टी ओलांडलेले , पोषाख पांढरी बंडी , पांढरे धोतर तसेच डोक्यावर पंधरा फेटा खांद्यावर उपरणे सतत ओसरीवर घोंगडी अंथरून मांडी घालून बसलेले असल्याचे आमचे दादाजी. घोंगडीच्या बाजूला नेहमी एक काठी असे , असो दादाजींचं वर्णन करता करता पूर्ण देखावाच डोळ्या समोर उभा राहिला आणि मनाला न आवारात त्या देखाव्याचे वर्णन केले .

उन्हाळ्याची अर्थात मे महिन्याची सुट्टी सुरु झाली की मी वडिलांकडे हट्ट करायचे की मला गावी पोहचवा , माझा हट्ट देखील पुरा केला जात असे , लहानपणापासूनच मला गावची ओढ इतर भावंडान पेक्षा जास्तच होती . साधारणपणे नववी पर्यंत माझी दरवर्षी गावाला भेट असायची महिना महिना वास्तव्य असायचे नि आदेशाचा डोस मिळायचे ते  दादाजीं कडून , ते त्यांचे अनुभव आम्हाला सांगायचे त्यातूनच आम्हाला उपदेश करायचे ,त्यावेळेस अल्लड होतो पण त्यांच्या धाकापोटी का होईना त्यांच्या समोर जाऊन बसायचो.
"ममईची (मुंबईची) पोर आली का ? मग काय लागली का सुट्टी ? साला (शाळा ) काय म्हणती ? अभ्यास करती का खाती धपाट ? काय हो दादाजी मी काय ढ वाटले तुम्हाला ? एकतर वर्षभर अभ्यास करायचा हीच तर सुट्टी मिळते मज्जा करायला ....... माझे आपले उगाच रागावणे .....
तस नाय इथे तुझं आई बाप नाय , इसवासान धाडत्यात आमच्याकड उगाच कालवा नको , चार गोष्टी आमीबी तुला शिकवायला हवं , पोरीची जात तू जपावं लागतंय ......... सखे (बायकोला हाक मारायचे ) पोर आलीय सुट्टीला चांगलंचुंगलं खायला घाल तिला . जरा आपल्या शेतातल काम शिकिव , दाव तिला नदीवरून पाणी कस वाहत्यात , डोक्यावर हंडे कास धरत्यात ,इतालच पोरगा बघू नि देऊ लावून तीच लगीन , कुणी बोलायला नको पोरगी शिकली  पण हुकली  ......... एवढे बोलून जोरजोरात हसत , माझं मात्र हे सगळं ऐकून तिळपापड होत असे . . मनात मी म्हणे , बोला काय बोलायच ते बोला एकदा का आम्ही सगळी मुले जमा झालो कि कोण ऐकतय तुमचं आम्ही करू मज्जा .
...

गावात घर रस्त्यावरच असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला  दादाजी हाक मारीत. राम राम , या ता वाईस  बसा मंग पुढ जा.. सखे ..च्या (चहा) टाका  पावण्यांना, मग काय दिवसभर ते चहाचं पातेलं चुलीवरून  ढळत नसायचे. कोणी न कोणी राम राम करीत यायचा  नि चहाचा  स्वाद घेवून पुढे जायचा. अख्या गावात त्यांचा दबदबा होता,  गावकरी त्यांना खूप मान देत. घरात सुमारे ५०-६० म्हशी, ५ जरशी गाई, चार बैल, दुधाचा व्यवसाय शिवाय  भरघोस जमीन . पण येवढं असून  ते मात्र फारसे शिकलेले नव्हते. थोडं फार लिहिता वाचता येत होतं त्यांना. असाच एका रात्री  त्यांनी आम्हां पोरांनाएकत्र केलं आणि म्हणाले " दिसभर गावं धुनाडलाय, या आता वाईच  बसा  इकडं, पोरांनो तुम्हाला गोस्ट आईकायाची  का नियतीची". त्यांच्या भाषेची लकब काही वेगळीच होती , मला खूप आवडायची, त्यात ते गावरान शब्द, कधी कधी मला अर्थ  समजून घ्यावा लागायचा मला. तसच  त्यांच्या " नियती" हा शब्द देखील नवखा होता मला त्या वयात समजायला...

पण त्यांनी व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आम्हांला.

त्याच  गावाचा सरपंच , त्याचं घर बीआमच्यावाणीच खटल्याच, दुध दुभत्यांन भरलेलं, मॉप जमीन लोकांची लुबाडलेली, पैका अडका भारी, त्याला चार पोरं, कारभारीण तर दागिन्यांनी मढलेली

जमीन जुमला पैका समद असून बि जपायची अक्कल नव्हती, कधी लक्षच दिलं न्हाय  घराकडं
 पर शिरमंतीची लई घमंड त्यांना, येता जाता गडी माणसांचा पाणउतारा करायचा, अडला नडला दिसला कि त्याचा फायदा घ्यायचा नि थोडं पैकं दिऊन त्याची जमीन घ्यायची ताब्यात, त्या येळाची लोकं भाबडी , त्यांना वाटायचं ह्यो आपल्याला गरजला मदत करत्योय . पर ह्यो पठ्या लय सोकावलेला . ह्याची कारभारीण गावाच्या बाय बापड्यांना आपल्या शेतात राबू राबू घ्यायची नि पिक आली कि चार दाणं टाकायची त्यांच्या पदरात.  त्यांना वाटायचं आप्ल्यावानी  कुणी न्हाय . मॉप हाय आपल्याकडं, चार चार पोरं हायत आपल्याला . काय बी कमी न्हाय.कशाचंच भ्यां नव्हतं त्यांना. . पर पोरांनो नियतीचा घाला भल्या भल्यांनाचुकला न्हाय. लई लोकांना लुबाडलं, कमी ल्याखलं, लई माज क्येला सिरमंतीचा, पर दिस त्येचं राह्यलं न्हाय.त्ये बी बदललं, पोरं कळती झाली
तशी  लागली वाईट चालीला , याक धड न्हाय निघालं , बापानं जेवढं कमावलं ते लागली गमवाया. आय बापाचं काय बी ऐकायचि न्हाइत...येका पोरांन तर बाप ऐकत न्हाय म्हणून घातली काठी त्याच्या कंबरडयात  नि मोडलं बापाचं कंबरडं , झालं लुळ ब्यानं.. नि पडलं येका जागेवर .. पार माज उतरला सिरमंतीचा, म्हातारी लागली जायला लोकांच्या श्यातात बिगारीवर , चार पोरंचारी दिसेला गेली.  आजच्या वगताला दोघं नवरा बायको गावकऱ्यांच्या  तुकड्यावर  जगत्यात, देवाकडं मरान  मागत्यात.........

एवढे बोलून दादाजी  गप्पा झाले. आम्ही देखील त्यांच्या चेहऱ्यावरचे  बदलते रंग पाहून स्तब्ध झालो. अचानक ते मोठ्या मोठ्याने हसू लागले. " तर पोरांनो काय? समजलं का? देवांन दिलाय ते जपून खा , उतमात करू नगा.आज हाय त्येच उद्या राहील ह्याची काय बी ग्यारंटी न्हाय. मानसाचा जनम एकदाच मिळतोय. सोताच्या स्वर्थापाई कुणाचं नुसकान करू नगा.गरिबी आली तर लाजू नगा नि शिरमंती आली तर माजू नगा.ज्ये पेरलं त्येंच उगवत असतंय येखाद्याला दुख दिलंततर समजा तेच पुढ त्येच तुमच्या नशिबाला आल्यावाचून राहायचं न्हाय.नियतीचा फेरा कुणाला बी चुकला न्हाय.आपल्या कर्माचं आपल्या पोरांना भोगावं लागतय...येवढ लक्षात ठिवा देवाला बी भोग चुकलं न्हाय मग आपण तर माणसच.

तर पोरांनो आज तुम्ही समदी जाणती हात..
एक लक्षात राहूद्या . कुणावर अन्याय करू नका.नाय्याने वागा नि कुणाचा अन्याय बी सहन करू नका.अन्याय करणारा नि त्यो अन्याय सहन करणारा दोघं तेवढंच पापी.नियतीन वागा म्हंजी देव बी तुम्हाला मदत करील.
दादाजींचे ते शब्द आजही माझ्या मनावर बिंबले गेलेत.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दादाजींनी केलेल्या उपदेशांची प्रचीती आलीय खरी...नियत सोडून वागणाऱ्यांचे, भल्या भल्यांचे हाल ह्या डोळ्यांनी पाहिलेत. खरे आहे "नियती"  कोणाला सोडत नाही आणि चांगल्या नियतीने वागणाऱ्यांना परमेश्वर मदत केल्याशिवाय राहत नाही... "दादाजी" कळत नकळत चांगले संस्कार मात्र करून गेले....

Saturday, September 29, 2018

अविस्मरणीय विस्मरण..


 
तसं बघायला गेलं तर विसराळूपणा म्हणजे मोठा त्रासच. पण ह्यातून ज्या गमतीजमती निर्माण होतात ना त्या आठवल्या की आपल्या वेंधळेपणावर हसूच येते… अणि मग त्यांच्या बनतात अविस्मरणीय आठवणी.
 
असं म्हणतात की कलाकार मंडळी विसराळू असतात कारण ती त्यांच्याच दुनियेत रममाण असतात.. पण माझ्या मते विसरभोळेपणा काही कुणा एका वर्गाची मक्तेदारी नाही.
 
आता आमचंच घ्या ना.. नवीन लग्न झालेलं.. एकदा रात्री जेवणानंतर पिक्चर बघायला जायची हुक्की आली. मग काय काढली गाडी, अणि निघालो. ह्यांना एक मेल करायचा होता म्हणुन सायबर कॅफेमध्ये गेलो.. पटकन मेल करुन पिक्चरला गेलो.. मस्त होता पिक्चर.. हीरो हिरॉईनच्या गप्पा मारत घरी आलो… अणि दार उघडायला गेल्यावर लक्षात आले.. किल्ली?. . किल्ली कुठाय.. घाईत निघाल्याने पर्स न घेता हातातच किल्ली ठेवली होती अणि आता ती त्या सायबर कॅफेमध्ये विसरले होते.. झाले..म्हणजे बसा आता सकाळी तो सायबर कॅफे उघडण्याची वाट बघत. रात्रीच्या दीड वाजता डोक्याला हात लावायची वेळ आली होती.. पण असे हातावर हात धरून बसणारे आम्ही कुठले.. घर सुदैवाने टॉप फ्लोरला असल्याने सुदैवाने मोठी ओपन बाल्कनी होती.. अणि सुदैवाने तिथे बाहेरून कुलूप लावलेले नव्हते (विसराळू असलो तरी सुदैव बलवत्तर असते).. ह्यांनी टेरेसवरून बाल्कनीत उडी मारून काहीतरी खटपट करून बाल्कनी चे दार उघडले अणि रात्री 3 वाजता माझा गृहप्रवेश झाला. हुश्श..

 
आता भाजीत मीठ घालायला विसरणे, जाताना नेलेली छत्री परत आणायला विसरणे, बाजारहाटाला जाणे अणि पिशवी न्यायला विसरणे ह्या तर अगदी नेहमीच्याच गोष्टी.. इतकंच कशाला, शॉपिंगसाठी म्हणुन जावं अणि एकूण एक पिशव्या भरून सामान घेऊन घरी आल्यावर लक्षात यावं, अरे! ज्या वस्तूसाठी गेलेलो, ती तर विसरलोच की!

 
माझ्या मैत्रिणीचा किस्सा तर अजून भन्नाट आहे.ते चार पाच जण मिळून प्रथमच सहलीला निघालेले.. . मुक्काम चांगला आठवडाभर असल्यामुळे सगळे सामान बॅगांमध्ये खचाखच भरून घेतलेले.. हे घेतलंय ना, ते घेतलंय ना करत एकदाचे निघाले सगळे.. निघाल्यावरही, पंखा स्विचऑफ केलास ना, पाण्याचा नळ बंद केलाय ना, गॅस सिलेंडर बंद आहे ना असे सुरूच होते.. .

शेवटी धमाल मस्ती करत लॉजवर पोहोचले अणि बॅगा उघडून बघतात तर काय.. गड्याने चुकून दुसर्‍याच बॅगा गाडीत ठेवल्या होत्या.. मूळ सामानाच्या बॅगा घरीच राहिल्या होत्या.. गप्पांच्या नादात सगळे बॅगा चेक करायला विसरले होते.. कपाळावर हात मारून घेण्या शिवाय दुसरे तरी काय करणार..

 
मग काय मंडळी, आहेत की नाही ह्या विस्मरणाच्या अविस्मरणीय आठवणी ..

काही जणांकडे मात्र नसतात अशा आठवणी.. अशा लोकांचा हेवा करावा की कीव कळत नाही .. जाऊ दे ना.. जास्त विचार नको करायला नाहीतर माझेच मौल्यवान विचार मी विसरून जाईन. 😀

 
डॉ पल्लवी प्रसाद बारटके


 

महाराष्ट्राचे आहारयुध्द.


स्थळ: गोदावरी काठी , महाराष्ट्रात कुठेतरी.

सर्व बाजुला हिरवीगार उभ्या पिकांची मैदाने ,बाजुला दुथडी वाहनारी गोदावरी मोकळ्या मैदानात आमनेसामने उभे ठाकलेले प्रचंड सैन्य.दोन्ही बाजुला रथावर वजनदार सेनापती होते. एकाच्या रथावर RD लिहीले होते तर दुसर्याच्या रथावर JD. दोन्ही सैन्यांमध्ये महाराष्ट्र भरातुन आलेले व्हाट्सअप ग्रुप चे गटप्रमुख,स्वयंघोषीत आहार तज्ञ , वजनाने विकारांने बेजार झालेले पांढरपेशे लोक सामिल होते.काही कुडमुडे सुध्दा भविष्यात डायटींगची गरज पडलीच तर माहिती हवी म्हणून वजनदार तलवारी कशातरी पेलत एखाद्या समुहात सामील होते.

गंमत म्हणजे सर्व वयांच्या विविध आकारांच्या महिला सैनिकांची संख्या लक्षणीय होती.

या गर्दीत गरिब कष्टकरी आभावानेच दिसत होता.

यातच,काय सुरु आहे हे पाहायला सोम्या - गोम्या या गर्दीत सहभागी झाले पण त्यांना कशासाठी युध्द तयारी सुरु आहे काहीच कळेना. राहवुन त्यांनी एका भराभरा बकने कोंबत असलेल्या ढेरपोट्याला विचारले तेंव्हा तो जोरात खेकसला. ‘ ५५ मिनीटे संपायला १० मिनीटे बाकी आहेत. जरा वेळाने या’.

सोम्या - गोम्या अजुन चक्रावले . ते विरोधी गटात घुसले तिथे एकाला विचारले. तो पण उत्तर देण्या ऐवजीमाझी तास संपलीत मला काहीतरी खाल्लेच पाहीजे म्हणूनतरातरा निघुन गेला.

सोम्या-गोम्यांना काही कळण्याच्या आतचयल्गारझाला दोन्ही बाजुंचे सैन्य तुटुन पडले.RD गटातील सैनिक दर तासांना चरता चरता चढाई करत होते तर JD गटातील ५५ मिनीटा दरम्यान शत्रुने काहीही केले तरी मुग ( किंवा काहीही) गिळुन गप्प होते!

यात काही धुर्त गटबदलु तळ्यात मळ्यात करत दर दोन तासांनी ५५ मिनीटे खात होती.

अखेर दोन महिन्याने अनिर्णीत अवस्थेत युध्द संपले.

अन्नाच्या दुर्भिक्षा मुळे वाचलेल्या सैन्यांना जेमतेम दोन वेळचेच खायला मिळायला लागले. युध्दात परिश्रम झाल्याने बर्याच जनांना आपली जुनी फिगर गवसली होती. काहींनी BP, कोलेस्ट्रॉल, शुगर चेक केली त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पण कमी जेवन किंवा शारिरीक परिश्रम अशा फुटकळ गोष्टींना श्रेय द्यायला कोणी तयार होईना.

काही दिवसांनी सोम्या - गोम्या सैनिकांच्या विरकथा फेसबुक वर वाचु लागले. प्रत्येक जन आपलीच रण( आहार) निती कशी योग्य हे पटवन्यासाठीयुध्दा पुर्वी- युध्दा नंतरअसे फोटो टाकु लागले.वाद परत वाढत चालला होता.

त्यातच SD नावाचा नविन आहार तज्ञ नवा कोरा डायट प्लॅन घेउन आलाएक दिवस पाहिजे तेवढे खा दुसर्या दिवशी पुर्ण उपवास करा, आठवड्यात १० किलो वजन कमी होणारच!’

त्याचेही समर्थक वाढु लागले.

दुसर्या आहार युध्दाच्या ठीणग्या परत पडतायत हे सोम्या - गोम्या ने ओळखले!!

-डॉ. अभिजीत लोणीकर

अबुधाबी.

[ उदघोषणा:लेखकाचा डायटिंगचा दुरान्वये संबंध नाही तो कुठल्याही डायट प्लान वर नाहीये.कथेतील नावे काल्पनिक नसुन जानकारांनी त्याचा योग्य संबंध लावावा!]

 

विविध रूपे माय मराठीची


भारत देशात मराठी बोलणारी माणसे जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत.जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच
मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते.आपण ज्या भागात राहतोत्या राज्याचा आणि परिसराचा आपल्या
 मराठी बोलण्याच्या पद्धती वर परिणाम होत असतोत्यामुळे कुठे बाहेर राहत असताना कोणी मराठी बोलताना दिसलं कि पहिला प्रश्न येतो " कुठली मराठी ".  मराठी भाषाव्याकरण एकच असलं तरी गावांनुसार त्याच नांव बदलतउदाकोकणी मराठीअहिराणी मराठीनागपूरी
 मराठीकोल्हापूरी मराठी आणि अजून किती तरीह्या प्रत्येक प्रकारात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकजीवनातले
 अनेक शब्द आलेले दिसतात,  जे लहान शब्दकोषात  सापडतीलच असे नाहीभाषा कोसांवर बदलते तर  कधी फर्लांगा वर बदलते.

मुंबई ची भाषा आता सरमिसळ झाली आहेत्यात हिंदी भाषिकांना समजावे असे शब्द दिसतातकोकण भागात ज्या प्रमुख
 भाषा बोलल्या जातात त्या म्हणजे आगरीकोकणीमालवणीतरी ही यामध्ये जिल्ह्यावर काही फरक पडतोचमुंबईहून आपण निघालो गोव्याला जाण्यासाठी तर याचा छान प्रत्यय येतो.

आमच्या इकडे रायगड जिल्ह्यात आपल्या मित्राशी बोलायची सुरुवातच " काय रे " अशी होतेमाझे किती तरी मित्र मैत्रिणी आजही  अगदी सोशल मीडिया वर जरी  भेटले तरी पहिला प्रश्न हाच असतो  " काय रेकसा आहेस रे?"  थोडे पुढे गेलो तर

 आपल्याला हेल काढून काढून बोलणारा भेटतोमला स्वतःला काही शब्द खूप आवडतातते म्हणजे आपण " तसं नाही" असं म्हणतो पण रत्नागिरी जिल्ह्यात  " तसं नव्हेम्हणतातअजून एक खास गोष्टखूप दिवसांनी जर  कोणी भेटले तर " मेल्या आहेस कुठे तू"? आणि मग सुरु होतेती मालवणीया भाषे बद्दल काय बोलणारगंगाराम गवाणकर,
 मच्छिन्द्र कांबळी या दोघांनी " वस्त्रहरण " नाटक देऊन मालवणी भाषा किती समृद्ध आहे हे दाखवून दिलंय.

कोल्हापुर भागात बोलली जाणारी कोल्हापुरी बोली आहेबोलीभाषापैकी कोल्हापुरी मराठी बोली ही गरीबखेडवळअस्सल
 शेतकऱ्याची बोली आहेलय काढून बोलण्याची लकब याभागात आढळतेभाषेत रांगडेपणा आणि प्रेमळता   असते.  मराठी भाषेच्या विविध धाटणींच्या बोलींपैकी पुणेरी मराठी बोली ही ज्यास्तीत ज्यास्त व्याकरणशुद्ध म्हणून  ओंळखली जाते,

नागपूरी भाषेच्या उल्लेखा शिवाय विषय पुरा होणे नाहीएका वाक्यात दोन क्रियापद एकत्र करून बोलणेकाय करून राहिल
 बे तू ?" आमच्या एका सरांकडे कधी गेलो कि ते "बैसम्हणायचेखूप दिवस ते कळतंच नव्हतंनंतर समजलं की बोलायची
 पद्धत आहे.

वऱ्हाडीमालवणीखानदेशीअहिराणीनागपुरी आदी बोलीभाषा ही मराठी भाषा समृद्ध करणारी सौंदर्यस्थळे आहेत
महाराष्ट्रात बोलीभाषांचा मोठा विविधढंगी फुलोरा पाहायलामिळतो.

हल्लीच्या दूरदर्शन मालिका किंवा चित्रपटांमुळे काही काही शब्द आपण तसेच्या तसे घेतले आहेतउदाहरण द्यायचं झाले तर,

 "लय भारी ", "चालतंय की", "काय राव " आणि खूपखूपते कुठून आले यापेक्षा ते शब्द आपले झाले.

या सगळ्या भाषांचे प्रकारबोलीभाषेचे आणि आपल्या सगळ्यांना समजावून सांगणारे साहित्यिकांचे असंख्य उपकार आहेत.

 अगदी बहिणाबाईंपासून ते नारायण सुर्वे आणि अजूनकितीतरीएका भाषे बद्दल लिहावंच लागेल ती म्हणजे "बेळगावी" .हि भाषा कोकणीकोल्हापुरीकन्नड यांचं सुंदर मिश्रण आहेपु.नी रंगवलेला " रावसाहेबचांगलाच  लक्षात राहिलाय.  अलिकडे  प्रकाश संत यांचा "वनवासपंखा "  असा  चार पुस्तकांचा संच प्रकाशित झाला ,  त्यांचा हिरो " लंपन " बेळगावी  आहे.

अनुभवआवडलेला आणि जिथे आगरी भाषा बोलली जाते तिथला एक किस्सा जो सर्वत्र बघायला मिळतोशाळेत 

जाणे महत्वाचे असतेच पण त्या जोडीला वडिलांना त्यांच्यापारंपरिक व्यवसायात मदत करणेदोन्ही करताना त्या मुलाची 
कशी गम्मत (कसरतहोतेमास्तर & तो मुलगा यांचे संवाद

मी चवतीन होतो.
सकाली उटलोआंग धवलाच्या  बटर खाल्ला.
पलत शालन झेलोउशीर झाल्तामास्तरनी झनकन कानाखाली पेटवलीपाच मिन्टं अन्दारकायपुन दिसना.
कसातरी खाली बसलोहजेरी चाल्लीवती.
 
मास्तर वरडलं
"
आत्ताच आयलो मी
"
हं दिसतय मना."
"
पुस्तकं कारा साल्यावहजेरी झल्याव मास्तर परत वराडलं
"
 अर तुझ्या उट  कालचा धरा वाचुन दाकीव. "
माजे पोटान गोला उटलाचवतीन होतू तरी वाचाला जमत न्हवतामी उबाच.
"
काल कुट श्यान खाया गेलवतास रं भाड्यामास्तर
"
बापासचे बरब खारीवर कोलब्या  चिम्बोर्या पकराला जेलेलो."
"
बापासला बलीव उदया नायतं सालंन येवाचा नाय  समजला ?"

या सगळ्या बोली भाषा, त्यांचा लहेजा, तो बाज आपण सगळ्यांनी जपावा, तर या भाषांना परत एकदा बहर येईल.


मनोज करंदीकर