Saturday, November 16, 2019

आठवणींच्या गावी - श्री. संतोष राक्षे

आज का कोणास ठाऊक; आठवणींच्या गावी नेतेय मला कोणी

झोपेतुन मला उठविण्या, केस कुरवाळील का आज कोणी
नको ना झोपु दे न थोडा वेळ, असा हट्ट पुरविल का कोणी
चेहरयावरुन हात मायेचा फिरवुन कपाळी, मऊसूत ओठ स्पर्शील का कोणी
ऊठ आता उशीर झालाय, असे म्हणुनी परत थोपटाविल का कोणी

आज का कोणास ठाऊक; आठवणींच्या गावी नेतेय मला कोणी

तोंड धुता धुता पेस्टसह, ब्रश हाती देईल का परत कोणी
रखरखित झालेल्या कोमल हातांनी, अंघोळ घालेल का कोणी
मिटलेले माझे डोळे तरीही, दोन सुबक वेण्या घालेल का कोणी
बुटाची नाड़ी बांधता बांधता, लुसलुसित पोहे भरवेल का कोणी

आज का कोणास ठाऊक; आठवणींच्या गावी नेतेय मला कोणी

माझ्या सगळ्या वेड्या प्रश्नांची, उत्तरे पुरवेल का मला कोणी
मेहंदीचे  हात माझे म्हणूनि, आपल्या हाताने वरण भात भरविल का कोणी
माझ्या अंगावर तिची बोटे उमटली, म्हणून स्वतःच रडेल का कोणी
गोड अंगाई ऐकवत कुशीत घेवुन, शांत झोपवेल का मला कोणी

आज का कोणास ठाऊक; आठवणींच्या गावी नेतेय मला कोणी

परिक्षेची वेळ - श्री. संतोष राक्षे

बरे झाले बाप्पा; उद्या पुन्हा येतेय परिक्षेची वेळ
परत घालीन मी; बुद्धि क्षमता आणि चातुर्याचा मेळ
तुम्ही  सारे रहा निश्चिन्त; नका करू जास्त विचार
कोणता का असेना पेपर; घेईन त्याचा नक्की समाचार

बाबा म्हणे भाषा; तर आई म्हणे गणितावर् जोर दे थोडा
कोणी म्हणे समाजशास्त्र; तर कोणी म्हणे भूगोल घालेल खोडा
शेवटी  मीच म्हणालो; आता सारे माझ्यावर तुम्ही सोडा
आता कुठेही अडणार नाही; माझ्या आत्मविश्वासाचा घोडा

दही साखर हाती देवून; आई लावेन माझ्या कपाळी चंदन
त्या अगोदर देवदर्शन; आणि आई बाबांना करीन वंदन
मी मात्र निर्धास्त आहे; मला न आता कसलांच घोर
कारण माझ्या मेहनतीच्या जोड़ीला; तुमच्या शुभेच्छा थोर

आमची दिवाळी - श्री. संतोष राक्षे


आमची दिवाळी खरं तर थोडी वेगळी होती,  छोट्या छोट्या आनंदाने ती भरभरून होती

मामाच्या गावी जाण्यासाठी होणाऱ्या कौरव-पांडवांच्या भांडणांइतकी कठीण होती
कधी शेंडेफळ म्हणून आईच्या सोबतीने पदर पकडून जाण्याइतकी लडिवाळ होती
घरी बनविलेल्या पारंपरिक कंदीलाच्या प्रकाशाने चांदण्यांचेही डोळे दिपवणारी  होती
कधी फुलबाजे, पाऊस कधी फुसक्या फटाक्यांच्या दणदणीत आतिषबाजीची होती……. 
तशी आमची दिवाळी खरंच थोडी वेगळी होती

चाहूल येताच घर गोठा आणि तुळशी वृन्दावन सारखी सारवून स्वच्छ होती
कधी कानाकोपऱ्यातील नैराश्यपूर्ण जळमटे झटकून देत नवचैतन्याची होती 
फराळातील करंजीमधील सारणासारखी तर कधी लाडवासारखी माधुर्याची होती 
कधी खुशखुशीत चकली, आंबूस अनारशे कि झणझणीत चिवडा यांतील पेचाची होती ……….
तशी आमची दिवाळी खरंच थोडी वेगळी होती

सर्व भावंडाना मिळणाऱ्या एकाच ताग्यातील शर्टइतकी चौकटीत होती 
कधी पिस्तूल आणि टिकल्यासाठीच्या आजी आजोंबांच्या लाडागत वारेमाप होती
बाबांसोबत येणाऱ्या लवंगी-लक्ष्मीबारच्या आवाजासारखी धुमधडाक्याची होती
कधी एका पंगतीत गुण्यागोविन्दाने खाल्लेल्या फराळाइतकीच  साग्रसंगीत होती …………
तशी आमची दिवाळी खरंच थोडी वेगळी होती

सकाळी चिरांत फोडल्यानंतर उटण्याचा ओवाळणीने सुंगंधी होती
कधी लक्ष्मीस्वरूप केरसुणीच्या मानाची तर गोमातेच्या ब्रम्हपूजनाची होती
बहिण भावाच्या त्या नात्यातील छोट्या भेटवस्तूही वाट पाहणारी होती
कधी शेतखळ् आणि घरात धनधान्याने भरलेल्या रांजनाएवढी समृद्ध होती ……..
तशी आमची दिवाळी खरंच थोडी वेगळी होती………….

भाऊबीजेच्या स्टीलच्या डब्यावर आपले नाव नाही म्हणून रुसण्याची होती 
कधी आईला पाडव्याला मिळालेल्या त्या लुगड्याच्या काठपदराइतकी भरजरी होती
आजोबांच्या कोऱ्या तलम रेशमी फेट्याइतकी रुबाबात मिरवणारी होती 
कधी वजरटीक पुतळ्यांच्या सुवर्ण अलंकारांनी आजीइतकीच सुरेख नटलेली होती  ………

तशी आज देखील साजरी केलेली हि दिवाळी देखील दिवाळीच आहे

आज देखील घरी  दिवाळीच्या  आठवणीत रमणारी आजोबा-आजी आहे 
सुखदुःखाच्या साथ देणाऱ्या आप्तांची मित्रांची निर्धास्त साथ आहे
आई बाबा आणि  वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाचा आम्हांला मान आहे   
काळाच्या ओघाने बदललेल्या संस्कृतीची आम्हांला आजही जाण आहे ……

ती दिवाळी वेगळी मान्य…. तरीही आजची दिवाळी देखील आगळी वेगळी आहे

श्री. संतोष राक्षे  


गणेशोत्सव २०१९ - श्री. मनोज करंदीकर




आपल्या सगळ्या भारतीयांचा, प्रामुख्याने मराठी माणसांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. आपण सगळेच हा सण - उत्सव आप -आपल्या परीने आणि पद्धतीने साजरा करत असतो. 

मला गणपती म्हटलं कि महाड ची आणि कोकणची आठवण होतेच. फक्त गणपती नाही तर श्रावण महिना सुरु झाल्यापासून येणारे सगळेच सण-व्रते, सगळ्या गावांत आजही उत्साहाने साजरी केली जातात. महाडला असताना गणपतीच्या आधी ७-८ दिवस घरात साफसफाई, झाडलोट सुरु व्हायची. गावामध्ये घरातील भांडी घासून पुसून स्वच्छ करून ठेवणे हे तर मोठे काम असायचे. त्यात ती चकाकणारी तांब्या पितळ्याची भांडी अशी एकत्र लावून ठेवलेली दिसली कि जाणवायचं सणांचे दिवस जवळ आलेत. त्यावेळी दागिन्यांपेक्षा घरातील भांडी हे भांडवल होते. आज घरातील साफसफाई ही व्हॅक्युम क्लिनर ने आणि ज्याला झाडू पोचा म्हणतात त्या मॉप नी होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, सगळ्या सुविधा हाती असताना सुद्धा २ बीएचके किंवा ३ बीएचके घरांची झाडलोट करताना दमछाक होते, तर या लोकांनी मुले, सूना, नातवंडे घरी येणारं म्हणून कसं काय केलं असेल? दारी अंगणात सारवणे त्यावर रांगोळी, घराच्या भिंती सारवणे ही सुरुवातीच्या काळातील कामे बघितली आणि केलीही आहेत. घर सुधारले तसे लादी- फरशी धुणे, घराला रंग लावणे अशी कामे व्यवथित सुरु असायची. गावातले लोक सांगायचे आणि आजही सांगतात की आमच्या कडे पैसे जास्त नव्हते पण हाकेला माणूस हजर राहायचा. हीच त्या लोकांची खरी कमाई होती. एवढंच नाही तर घरी आलेल्या पै पाहुण्यासाठी फराळाचे पदार्थ करून ठेवले जायचे. 
हरितालिका पूजनापासून सुरु होऊन गौरींबरोबर विसर्जन असा पाच दिवसांचा गणेशोत्सव. बाप्पांचे वाजत गाजत आगमन, भल्या पहाटे पूजा, घरोघरी आरत्या. खास गणपती साठी मिळणारी फळे, केवडा, अत्तर, अगरबत्ती, या सगळयांनी वेगळेच असे भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळायचे. आकर्षण असायचे ते या दिवसांत होणारे विविध कार्यक्रम, आज प्रसिद्ध असलेले  "बाल्या नृत्य", भजनी मंडळे, सार्वजनिक मंडळांच्या लेझीम मिरवणुका, रस्त्यावर सिनेमा बघणे. आज सगळ्या स्वीट मार्ट मध्ये प्रसादासाठी अनेक पदार्थ मिळतात, पण खोबरे आणि साखर मिसळून केलेली खिरापत एकदम आठवते.

आज नोकरी निमित्त इकडे असल्यामुळे काही वर्षे आमचा गणेशोत्सव इथेच साजरा होतोय. एक वेगळा आनंद, अनुभव मिळतो. सुरुवातीला असे वाटायचे की सगळ्या गोष्टी मिळतील का नाही? पण बाप्पाना काळजी किंवा देव सगळे व्यवस्थित करून घेतो, तसे काहीच अडले नाही. तीच स्वच्छता मोहीम, तेच पूजा साहित्य,  विड्याची पाने ते कमळापर्यंत सगळेच उपलब्ध असते. अगदी घरोघरी गणपतीची स्थापना होत नाही, पण त्यामुळे ज्यांच्या कडे गणपती आहे तिथे दर्शनाला जाणे हा खास कार्यक्रम असतो. या वर्षी गणपतीच्या पाच दिवसात साधारणतः १००-१२५  नातेवाईक आणि मित्रमंडळी घरी येऊन गेले. एका संध्याकाळच्या आरतीला ४०-४५ जण होते.  यावर्षीचा गणेशोत्सव लक्षात राहण्यासारखा आणि आनंदात साजरा झाला. आपल्या मंडळाच्या टॅगलाईन प्रमाणे जयतु जन्मभूमी  जयतु  कर्मभूमी,  आपण कुठे ही असलो तरी हे सगळे यथा शक्ती करायला मिळणे आणि त्या निमित्ताने एवढी माणसं घरी येणे हा अनुभव खूप काही देऊन जातो.  

गणपती बाप्पा मोरया.


दिवाळी आठवणीतली: सौ. नम्रता नितीन देव


आनंद घेऊनि आली दिवाळी दिवाळी 
       करता स्वागत तियेचे मन गेले भूतकाळी 
बालपणीचा तो काळ होता फारच सुखाचा 
         नव्हता फार थाटमाट छोट्या छोट्या आनंदांचा 
पडता सुट्टी दिवाळीची वेध लागती किल्ल्यांचे 
          मोहरीची छोटी शेते आणि मातीच्या मावळ्यांचे    
 फराळाच्या तयारीची चाले धांदल आईची 
          खर्च आणि बोनसची गणिते चालती बाबांची 
फटाक्यांच्या वाट्यासाठी लुटुपुटुची भांडणं  
             आईच्या हाताखाली खमंग फराळ रांधणं 
नसे फार लखलखाट मंद पणत्यांचे तेवणे 
                रांगोळीच्या त्या रंगांनी सारी रंगती अंगणे 
कुडकुडत्या थंडीत अभ्यंगस्नानाला उठणे
               बंबातले उष्ण पाणी आणि सुगंधी उटणे 
फराळाच्या तबकांची चाले शेजारी देवघेव 
             ती जपलेली नाती पिढ्यापिढ्यांची आहे ठेव 
अशी साधेपणातच दिवाळी साजरी व्हायची 
              संस्कृती आणि परंपरा अशी जपली जायची 

सौ .नम्रता नितीन देव

आमच्या घरी आली दिवाळी - कु. पावनी प्रसाद बारटक्के


Tuesday, September 10, 2019

कविता: जशी मला भावली - श्री. मंदार आपटे




ब्रह्मवैवर्त पुराणाप्रमाणे त्रेता युगात शूर्पणखा रामाला आपला करू शकली नाही. युद्ध संपले पण तिच्या मनातील राम गेला नाही. तिने तपश्चर्या केली आणि ती कुब्जा म्हणून द्वापार युगात जन्माला आली. 
भागवत पुराणा प्रमाणे कुब्जा एक कुबडी आणि वाकड्या तिकड्या शरीराची तरुणी होती. ती कंसाची दासी होती. मथुरेमध्ये सुवासिक तेल आणि उटणे बनवण्यात तिचा हात कोणीही धरू शकायचे नाही. जेंव्हा कृष्ण कंसाला मारायला मथुरेला आला, तेंव्हा त्याने कुब्जेकडे तिने बनवलेल्या सुगंधी तेलाची आणि उटण्याची मागणी केली. कंसासाठी केलेल्या वस्तू तिने कृष्णाला आनंदाने दिल्या. कृष्णाने तिला स्पर्श करताच तिचे रूपांतर एका निरोगी, सुदृढ सौंदर्यवतीमध्ये झाले. कंसाला मारल्या नंतर तिचे आणि कृष्णाचे मिलन झाले. तिचे वाट पाहणे संपले.

२४ ऑगस्टला कृष्णजन्माष्टमी होती. त्या निमित्त मी इंदिरा संतांची ही कविता निवडली. ती मला जशी भावली तशी तुमच्या समोर मांडतो. 

कुब्जा - इंदिरा संत

अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ
मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भनभन
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन
विश्वच अवघे ओठ लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यामधुनी थेंब सुखाचे....
हे माझ्यास्तव.... हे माझ्यास्तव


पहाटेची वेळ आहे, अजून राधा आणि गोकुळ जागे झालेले नाही. पण नदी पलीकडून मंजुळ बासरीचे स्वर ऐकू येत आहेत. चंद्र मावळतोय, वारा सुटला आहे. ती आपले तनमन विसरून पाण्यात उभी आहे. तो वैश्विक मुरलीरव ती मनसोक्त प्राशन करत आहे. तिच्या डोळ्या वाटे आनंद अश्रू रूपाने ओघळतो आहे कारण तिला माहिती आहे की हा मुरलीरव तिच्या साठी आहे, फक्त तिच्या साठी.

किती सुंदर शब्द आणि किती प्रभावीपणे कवयत्री आपल्या समोर दृश्य उभे करते. असे वाटते की कविता वाचता वाचता कल्पनेच्या कुंचल्याने ती आपल्या समोर प्रत्यक्ष चित्र रंगवत आहे. शब्द योजना देखील किती सयुक्तिक आहे. भनभन  हा शब्द मात्र जरा विसंवादी वाटतो. आणि शेवटची ओळ तर किती प्रभावी आहे.

कुब्जा म्हणजे प्रतिक्षेची परिसीमा. आपल्या प्रियकराबरोबर मिलन होण्यासाठी तिने  दोन युगे (दहा लाख वर्षापेक्षा जास्ती काळ) वाट पहिली. बरं इतके थांबूनही कृष्ण तिला मिळेल की नाही याची खात्री नसताना देखील ती थांबली. तो पर्यंत त्याने तिच्यासाठी काहीही केलेले नव्हते. कवितेच्या शेवटच्या ओळीला म्हणूनच अनन्यसाधारण महत्व आहे.

या कवितेमध्ये कवयत्री थोडी साहित्यिक सवलत घेते. कुब्जा गोकुळात नाही तर मथुरेत होती. तिला राधा माहिती असण्याची शक्यता कमीच. कृष्णाने मुरली कधी गोकुळाबाहेर वाजवली नाही त्यामुळे कुब्जेने ती ऐकली असणे शक्य नाही. पण इतक्या सुंदर कवितेसाठी ही साहित्यिक सवलत माफ आहे.

कविता म्हणजे काय .... : श्री. राजन तावडे


तिची आठवण ... त्याचं झुरणं : श्री. राजन तावडे


सण भरला श्रावण: सौ. नम्रता नितीन देव



ऊन-पाऊस नि रिमझिम सरींचा
श्रावण आला श्रावण आला ।
समृद्धीचा सणासुदींचा श्रावण आला श्रावण आला ।
नागपंचमीचा सण पहिला नागोबाला पुजण्याचा
मुलीबाळींनी फेर धरुनी, झोपाळ्यांवर झुलण्याचा ।
श्रावणी सोमवार शंकरपूजन व्रत आणि उपवासाचा
शाळेच्या अर्ध्या सुट्टीचा आणि गोडधोड नैवेद्याचा ।
नाना परिच्या फुलापत्रीनी मंगळागौर अशी सजली
झिम्मा, फुगड्या गोफ विणूनी रात्र सारी मग जागवली ।
शुक्रवारी जिवतीचे पूजन लेकरांच्या दिर्घायुष्यासाठी
पुरण पोळीचे भोजन देऊनी सुवासिनीची भरली ओटी ।
नारळी पौर्णिमेचा सण आला कोळीबांधव आनंदले
वाजतगाजत कृतज्ञतेने सागरास नारळ अर्पियले ।
बहीण भावाच्या नात्याचा सण रक्षाबंधनाचा
रक्षणकर्त्या भावाला प्रेमाचे बंध बांधण्याचा ।
आनंदसोहळा कृष्णजन्माचा सण गोकुळाष्टमीचा
गोविंदांनी थर रचले थरार असा दहीहंडीचा ।
बघता बघता सरला श्रावण आली अमावस पिठोरीची
मातृदिन हा साऱ्यांसाठी बैलपोळा कृतज्ञ शेतकऱ्यांसाठी ।
सणभरला असा हा श्रावण आनंदसरी बरसून सरतो
सरता सरता श्री गजाननाच्या आगमनाची चाहूल देतो ।


                                          सौ. नम्रता नितिन देव



मुक्तचित्र - कु. पियुष शितोळे


निसर्गछटा - कु. पियुष शितोळे




Sunday, July 7, 2019

पाऊस आठवणीतला - श्री. अजय पडवळ


"तुझ्यापेक्षा इतके तितके किंवा अमुक तमुक पावसाळे जास्त पाहिलेत मी"..... फुशारक्या मारण्यासाठी हा वाक्प्रचार आपल्याकडे सर्रास वापरला जातो. पण पावसाळा ही केवळ पाहण्याची नाही तर अनुभवयाची गोष्ट आहे. आपल्यातल्या प्रत्येकाने पावसाचा अनुभव लहानपणापासुनच नक्कीच घेतलेला असेलच, पण या बाबतीत मी स्वतःला थोडा भाग्यवान समजतो. तळ कोकणातला ढगफुटीचा अंगावर येणारा पाऊस, तसेच मुंबईतील जनजीवन विस्कळीत करणारा पाऊस, अशी पावसाची विविध रूपे अनुभवता आली. 

पाऊस’ हा शब्द नुसता ऐकला तरीही बालवाडीत शिकवली गेलेली “ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा” ही कविता न आठवली तर आश्चर्यच. पावसाची पहिली ओळख झाली ती कोकणातच. मी लहान असतानाची घटना. खूप मोठे वादळ पावसाला घेऊन आले. घरातील जाणती मंडळी भात लावणीसाठी शेतावर गेलेली. घरी आत्या मला सांभाळत होती. वादळाने गावातील घरांवरची, देवळावरची कौले उडवून दिली. पावसाने झोडपले. शेतावरची  मंडळी ओढ्याला आलेल्या पुरामुळे पलीकडेच अडकून पडलेली. अशातच माझी आत्या माळ्याच्या उरलेल्या लाकडाच्या फळ्यांखाली मला छातीशी कवटाळून भेदरलेल्या अवस्थेत तग धरून, जीव मुठीत घेऊन घेऊन उभी होती, पाऊस संपेपर्यंत. हीच माझी पावसाबरोबर झालेली पहिली भेट बहुतेक...

असे असले तरी कोकणातला पाऊस नेहमीच इतका रौद्र, भीषण असतोच असे नाही. कोकणातील पाऊस म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. जणू एक लॅन्डस्केपच. एका बाजूला अरबी समुद्राचा नितांत सुंदर, उधाणलेल्या लाटांचा समुद्र किनारा तर दुसरीकडे अभेद्य सह्याद्रीचे गगनाला भिडणारे कातळकडे. हे डोंगर कडे म्हणजेच पावसाळ्यात खळाळत जमिनीवर झेपावणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यांचे माहेरघरच. इतर वेळी काळा कभिन्न, राकट असणारा हा सह्याद्री पावसाळ्यात मात्र हिरवाईने नटतो, आणि त्याच्या माथ्यावर साचलेलं पाणी जेव्हा खाली झेप घेते तेव्हा दुरून दिसणारी ती पांढरी शुभ्र रेष म्हणजे सुंदरीच्या काळ्याभोर केसातली जणू रेशमी बटाच भासते. ही बटा अलगद हातात घ्यावी अन तिच्याशी प्रेमालाप करावा असे कुणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. 


ग्रीष्माचा कडकडीत उन्हाळा सर्वांगी घामाच्या धारा फोडत असतानाच अचानक आकाशात गडगडायला लागतं, काळे ढग दाटून येतात आणि वळवाचा पाऊस पडायला सुरुवात होते. धरणीमाता चिंब ओली होते. त्यावेळी येणारा मातीचा मोहक सुगंध प्रत्येकाच्या मनाच्या कुपीत ठाण मांडून बसतो. 

रातकिड्यांची किरकिर संपून बेडकांची डराव-डराव जुगलबंदी सुरु होते. पहिल्या पावसाचं पाणी पिऊन धरती तृप्त झाली की शेतकरी राजा सर्जा-राजाचं औत बांधतो, पेरणीची तयारी करतो, सगळ्या शिवारात हिरवेकंच कोंब उगवतात. इवली इवली ईरली घेऊन आयाबाया शेतात रांगू लागतात. उन्हाने रखरखलेले डोंगर, माळराने हिरवा शालू नेसतात. कोरड्या ओढ्यांना झऱ्यांचे पाझर फुटतात. त्याच ओढ्यांतून मासे वळचणीस लागतात. सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झालेला असतो. त्याच्या वाहनावरून वरूणराजा किती बरसणार याचे आखाडे अनुभवी मंडळींकडून लावले जातात. मृगातून सूर्यदेवाने आर्द्रात प्रवेश केल्यावर पावसाचा अंदाज बघून भात लावणीला सुरुवात केली जाते. या काळात मात्र पावसाची जोरदार हजेरी असते. तशी गरजच असते. पण काही वेळा तर इतका बरसतो की शेतमळे पाण्याने वरपर्यंत भरून वाहू लागतात, पाणी थोपवणे अशक्य होते. भातलावणीचे कामही थांबवावे लागतं, ओढ्यांना पूर येतो, अशा पावसात हौशी मंडळी इंद घेऊन मासे पकडायला धावतात. रात्रीच्या मासेमारीसाठी मात्र संथ वाहणारे निर्मळ पाणी, अजिबात पाऊस नसलेली, चांदणं पडलेली रात्र निवडली जाते.

खरंच कोकणातला पाऊस म्हणजे निसर्गाचं मुक्त नृत्य, पर्वत रांगांमधून कोसळणारे असंख्य धबधबे, दुधाचे घट फोडत खळखळ वाहणारे ओढे, डोंगरांना आच्छादून टाकणारे काळेभोर ढग, घाट रस्त्यांना कवेत घेणारी धुक्याची दुलई, हिरवाई परिधान केलेली माळ-राणे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, वाऱ्यावर डोलणारी भाताची खाचरं, गोड्या पाण्यातले मासे, खेकड्याच्या रस्सा, किल्ल्यांवरचे ट्रेक....



कोकणातल्या पावसाची एक गम्मत आहे, धो धो कोसळला काय किंवा २-३ दिवस सतत रिपरिप लावली काय, एकदा का थांबला की अगदी थोड्याच वेळात सर्व काही पूर्ववत. 

मुंबईतला पाऊस मात्र यापेक्षा बराच वेगळा. जनजीवन विस्कळीत करणारा, पण तरीही मंत्रमुग्ध करणारा. लहानपणी वडाळ्याला, चाळीत राहत असताना अगदी अर्धा तास जरी पडला तरी बाहेर सगळीकडे पाणी तुंबत असे, अजून अर्धा एक तास जास्त पडला की मग बाहेरचे पाणी घरात शिरत असे. मग आम्हा भावंडांची जमिनीवर असलेल्या वस्तू वर उचलून ठेवण्यासाठी धडपड सुरु होत असे.

शाळेत शेवटच्या बेंचवर भिजलेल्या छत्र्या आणि रेनकोट सुकायला टाकायला मुलांमध्ये स्पर्धा लागायची. शाळेचा कंटाळा आला की मात्र खूप मोठा पाऊस पडून बसेस आणि शाळा बंद पडावी अशी मनोमन ईच्छा व्हायची, बऱ्याच वेळा ती अपुरीच राहायची. चाळीतल्या घरावर ऍसबेसटॉसचा पत्रा होता. रात्री झोपायच्या वेळी त्या पत्र्यावर पडणाऱ्या थेंबांचा विशिष्ट आवाज कानात घुमत राहत असे. त्याच्या लयी कमी जास्त होत. त्या संगीतमय वातावरणात डोळे झोपेच्या अधीन होत. मुंबईच्या लोकांना पावसात बस, लोकल बंद पडणे, कामावर गेलेली मंडळी अडकून पडणे हे काही नवीन नाही. शाळेत जाताना दुमजली (डबल डेकर) बसच्या वरच्या मजल्यावरच्या सर्वात पुढच्या सीटवर बसून समोरून येणाऱ्या पावसाच्या तुषारांचा आनंद लुटणे यासारखे दुसरे सुख नसावे. 

बाकी खऱ्या पावसाचा आनंद घ्यायला मुंबईकर मंडळी वरळी सीफेस, बॅण्डस्टॅण्ड, मरीन ड्राईव्ह अशा ठिकाणी हजेरी लावतात. भर पावसात उधाणलेल्या समुद्राच्या फूटच्या फूट उंच उडणाऱ्या लाटांच्या सानिध्यात मंडळी कधी कुटुंबासोबत तर कधी मित्र मंडळींसोबत बेभान होऊन जातात. मुंबईचा पाऊस म्हणजे खरंच एक रोमांचित करणारा अनुभव असतो. आमच्या पिढीने पावसाचे असे अनेक अनुभव घेतले. यापुढची पिढी मात्र आमच्या सारखी ये रे ये रे पावसा म्हणण्यापेक्षा “rain rain go away” असे म्हणण्यात खुश आहे असे वाटते. अशाने आयुष्यातल्या आनंद देणाऱ्या अविस्मरणीय क्षणांना मुकणार की काय अशी भीती नक्की वाटते.

पाऊस आणि छत्री - सौ. शैलजा कुलकर्णी


पाऊस आणि छत्री चे असते अनोखे नाते
बालक असो वा तरुण मस्तीचे येते भरते।।

एक पाऊस दोन डोकी, एक छत्री दोघांची मैत्री
तु का मी करताकरता, भिजण्यातच खरी दोस्ती।।
                         
लहानपणी शाळेबाहेर तळे साचे मोठ्ठे
छत्री हाती घेऊन, थयथयाट करीती पोट्टे ।।

मान्सून वाटे रोमांचक, काॅलेज च्या काळात
हातात होती छत्री पण लक्ष तिच्या येण्यात ।।

तिलाही ठाऊक होती, माझी उभे राहण्याची जागा
मुद्दामच छत्री विसरत असावी, माझ्या सोबतीने जाण्या।।

ऑफिसाला जाताना,  छत्री आली काखेत...
बालपण आणि तरुण पण गेले, सभ्यतेच्या बॅगेत ।।

आत्ता कुठे वेळ मिळाला, मान्सून चा आनंद घेण्याचा..
आता वाटे.... नको छत्री .. नको बंध जगाचे,
भिजावे ... धो  धो पावसात,  हात धरून अर्धांगिनी चे।। 

पाऊस - सौ. नम्रता नितीन देव


ये रे ये रे पावसा म्हणता
       कधी येशील रे? म्हटलं ।
आणि बघता बघता
       मन काळजीने रे भरलं ।
पाणी टंचाईने साऱ्यांचे
       डोळे पाण्याने भरले ।
बळीराजाचे आशेने
       डोळे आभाळा लागले ।
साऱ्या सृष्टीच्या हाकेला
       मग आभाळ धावले ।
झिम्माड होऊन मग ते
       शतधारांनी बरसले  ।
साऱ्या उशिराची कसर
       त्याने भरून काढली ।
तृषार्त धरणीला
       त्याने चिंब चिंब केली ।
असा तिथे गावाकडे
       पाऊस बेधुंद बरसणारा ।
येथे मात्र सूर्य जणू
       आग ओकणारा ।
तिथल्या पावसाने
       मन येथे चिंब होते ।
कागदी होडीत बसून
       बालपणाला भेटते ।    

कविता: जशी मला भावली - श्री. मंदार आपटे


पोरसवदा होतीस - बा.सी.मर्ढेकर

भारतीय परंपरेमध्ये स्त्रीची अनेक रूपे आहेत. कधी मुलगी, कधी भगिनी, कधी अर्धांगिनी, कधी माता, कधी आजी, कधी रणरागिणी, कधी साध्वी...

१६ जूनला भारतामध्ये पिता दिवस (फादर्स डे) असतो. आज मी मर्ढेकरांची ही कविता याच कारणाने निवडली. ती मला जशी भावली तशी तुमच्या समोर मांडतो.

पोरसवदा होतीस - बा.सी.मर्ढेकर

पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
होता पायातही वारा
काल-परवापावेतो.

आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोट्या जीवाची साखळी.

पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायांचे घेतो.

ही कविता एका बापाची कविता आहे. कवितेची सुरुवात पित्याला आपल्या लेकी बद्दल वाटणारी ममता दर्शविते. पण तो हे जे म्हणतो ती भूतकाळातील गोष्ट आहे. आज तीच लेक लग्न होऊन आपल्या पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आलेली आहे. तिचे पोट आतील बाळामुळे टपोरे झाले आहे आणि याच बाळासाठी तिच्या पायी एका छोट्या जीवाची साखळी, एक हवेहवेसे वाटणारे गोड बंधन, पडले आहे. तिच्या हालचालींवर निर्बंध आलेले आहेत. जरी ती कालची पोर असली तरी पण आता ती उद्याची माउली आहे. आणि माउली ही सर्वाना वंद्य आहे, म्हणून तो पिता तिच्या पायाचे तीर्थ घेऊ इच्छितो.

कवी अगदी कमी शब्दात आपल्याला खूप काही सांगून जातो. पहिल्या कडव्यात बापाचे लहान लेकीसाठीचे प्रेम दिसते, दुसऱ्या कडव्यात ती बाळंतपणाला आल्याबद्दल समाधान आणि तिच्यात होत असलेल्या स्वागतार्ह बदला बद्दल कौतुक आहे तर तिसऱ्या कडव्यात उद्याच्या माउलीला वंदन आहे. आज ती लेक बापापेक्षा मोठी झाली आहे.

या कवितेत जितक्या बापाच्या भावना आहेत तितकीच स्त्री बद्दल आणि विशेष करून माते बद्दल असलेला भक्तिभाव आहे. माता, मग ती कोणाचीही असो, सर्वथा वंद्य आहे. ती आपल्या पिलाला मोठे करण्यासाठी जो त्याग करते त्या त्यागाला केलेले हे वंदन आहे आणि लेकीच्या पायाचे तीर्थ घेण्याची तयारी दर्शवणाऱ्या बापाच्या मनाचा मोठेपणा सुद्धा आहे.

आपली मराठी... आपल्या म्हणी - सौ. विद्या भट


दिलेल्या अर्थाची म्हण ओळखा. अट एकच ती म्हणजे ही म्हण क किंवा ख नेच सुरू झाली पाहिजे.  यावेळी व्यंजन असल्याने काना, मात्रा, वेलांटी इ. चालेल .... चला तर मग लागा कामाला...

१. जवळ असलेली वस्तू लक्षात न राहिल्याने सगळीकडे शोधाशोध करणे
२. मुळचा स्वभाव बदलत नाही
३. एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर आधी खूप मेहनत घ्यावी लागते
४. काहीवेळा आपलीच माणसे आपले नुकसान करतात
५. ज्याने अपराध केलेला असतो त्याला त्याची सल लागलेली असते
६. जसे आईवडील असतात तशीच त्यांची मुले असतात
७. गरजेपुरते एखाद्याशी संबंध जोडणे
८. दुराचारी माणसाच्या कृत्यामुळे कधीही चांगल्या कामाचे नुकसान होत नाही
९. सत्ता, संपत्ती गेली तरी त्याचा बडेजाव कायम असणे
१०. चुक केलीच नसेल तर भीती कशाला बाळगायची

उत्तरे:

१. काखेत कळसा आणि गावाला वळसा
२. कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं, तरी कडू ते कडूच /
        कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच
३. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे
४. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
५. खाई त्याला खवखवे
६. खाण तशी माती
७. कामापुरता मामा ताकापुरती आजी
८. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
९. काप गेले आणि भोके राहिली
१०. कर नाही त्याला डर कशाला

संकलन: सौ. विद्या भट

पावसाळी निसर्गाच्या छटा - कु. पियुष धनंजय शितोळे






निसर्ग चित्रे - कु. आदित प्रशांत बलदावा





Sunday, June 9, 2019

चित्रकला - कुमारी सारा पटवर्धन



चित्रकला - कुमार आयुश मनीष चिटणीस




कॅनव्हास चित्रकला - श्री अमित पाटील






Mobilography - श्री. मनोज करंदीकर

दुबई मिरॅकल गार्डन

















रोहतांग पास


कविता : अंगठा - सौ क्षमा आठवले



हरवेलेलं सापडलं - श्री. मनोज करंदीकर



मार्च २०१९ मध्ये पुण्याला सुट्टीला गेलो होतो. एका पूजेच्या निमित्ताने खूप जण जेवायला आले होते.
शेवटची पंगत आमची घरच्या मंडळींची होती. आमच्या बरोबर एका मामाची सून पण होती. ती श्रुती सडोलीकरांकडे गाणे शिकते. मग तिला गाण्याचा आग्रह झाला आणि गाणं संपल्यावर जेवायचं असं फर्मान निघालं. तिने "पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे" हे गाणं खूपच सुंदर म्हटलं. चांगलीच तयारी आहे गाण्याची. हे गाणे ऐकून सुट्टीचे पुढचे काही दिवस तेच गाणं गुणगुणण्यात गेले. अर्थात घरी कार्यक्रम व्हायचे तेव्हा या गाण्याची अक्षरशः उजळणी झालेली आहे.
इकडे परत आलो तरी पण मन त्या गाण्यातच. मग सुरु झाला तो आवडता प्रकार, एखादे गाणे/कविता रोज ऐकायची. आता तर गाणे ऐकणे वा गाणे बघणे खूपच सोप्पे आहे. गुगल मावशी किंवा युट्युब मावशी ला सांगायचं की आपले गाणे सुरु. २५-३० वर्ष मागे बघितलं तर फक्त रेडिओ आणि मग आलेला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. खरं तर हे गाणे १९७९ च्या "सोबती" या चित्रपटातील. गीतकार - गंगाधर महाम्बरे, संगीतकार - श्रीनिवास खळे आणि गायिका- आशा भोसले. श्रीनिवास खळे यांच्याबद्दल आपण काय बोलणार? गाणे कसं सुंदर आणि श्रवणीय होईल हे त्यांचे तत्व. भीमसेनजी, वसंतराव देशपांडे, सुधीर फडके, अरुण दाते, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर यांनी खळे काकांकडे गाणी गायली आहेत. आपण सगळेच या सगळ्यांची गाणी ऐकताच मोठे झालोय. उदा: निज माझ्या नंदलाला, या चिमण्यांनो परत फिरा, सर्व सर्व विसरू दे, पहिलीच भेट झाली .............. ते अगदी जेव्हा तुझ्या बटांना पर्यंत.
"पाण्यातले पहाता" या गाण्याबरोबरच अजून दोन गाणी आहेत " सोबती" मध्ये. ती म्हणजे "आली आली सर ही ओली" आणि "सावलीस का कळे उन्हामधील यातना". तिन्ही गाण्याची नजाकत, बाज पूर्ण वेगळा आहे. आशा भोसले यांची दोन गाणी आणि एक साक्षात लता मंगेशकरांचे. गंगाधर महाम्बरे यांनी किती सुंदर रचना केल्या, त्याला उत्तम संगीत देऊन श्रीनिवास खळेंनी आपल्याला आनंद दिला. बरेच वेळा एखादा सिनेमा येऊन जातो कळत देखील नाही, पण त्यातील गाणी कायम लक्षात राहतात.
"सावलीस ना कळे" हे गाणे ऐकून तेच जाणवलं की आपण किती तरी वर्षांपासून ऐकत होतो पण आज तीच गाणी नव्याने सापडली. आज या निमित्ताने गीतकार, संगीतकार आणि गायिका अशा थोर मंडळींना सलाम.

लेखन - श्री. मनोज करंदीकर

माधुरी दिक्षित :१५ मे १९६७ - श्री मनोज करंदीकर


हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये अभिनेत्रीचा विचार केला तर त्यात दक्षिण आणि उत्तर भारतीय जास्त आहेत.  दक्षिण म्हटलं तर वैजयंती माला, पद्मिनी, वहिदा ते अलीकडच्या शिल्पा शेट्टी पर्यंत. उत्तर भारतीय म्हटलं तर मीना कुमारी, नर्गिस पासून अगदी आताच्या अनुष्का पर्यंत. मराठी अभिनेत्री पण होत्याच, पण सुपर स्टार कोणी नव्हतं
१९८० ते १९९० या काळात खूप नवीन अभिनेत्री नावारूपास आल्या. त्यात महत्वाची नांवे म्हणजे श्रीदेवी, जयाप्रदा. यांच्या बरोबरच एक मराठी मुलगी हिंदी चित्रपटात काम करायला लागली होती. अबोध, स्वाती हे खूप सुरुवातीचे सिनेमे केल्यानंतर तिला संधी मिळाली "हिफाजत" मध्ये अनिल कपूर च्या समोर काम करायची (बटाटा वडा हे गाणे याच सिनेमातील). तेव्हा कोणाला माहित होतं कि पुढे या कलाकारा बरोबर जोडी जमेल आणि आपण मोठे स्टार होऊ. थोडा फार नाव होतं असताना एक अजून सिनेमा आला "दयावान", हा फिरोज खान बॅनरचा आणि त्याच्या खास स्टाईलचा. हा फेमस झाला तो अभिनया पेक्षा "आज फिर तुमसे प्यार आया है" या गाण्याने. हे सगळं सुरु होते, पण अजून यश म्हणजे काय ते मिळालं नव्हतं.  
१९८८ मध्ये एन.चंद्रा या मराठी दिग्दर्शकाने "तेजाब" सिनेमा तयार केला आणि त्यात मोहिनी हा रोल दिला  आणि एका दिवसात ती स्टार झाली. "एक दोन तीन…" या गाण्याने आणि तिच्या मनमोहक नृत्याने सगळयांना वेडे केले. हा सिनेमा चांगला, सगळे उत्कृष्ट कलाकार अनुपम खेर, अनिल कपूर, सुहास जोशी. जितकी गाणी चांगली तितकेच सुमधुर संगीत दिलाय एल.पी. नी.
तेजाब नंतर एक हुकमी एक्का म्हणून तिची घोडदौड सुरु झाली. "दिल" सिनेमाने तर तिला मोठं यश दिलं. राम लखन, परिंदा, खेल, किशन कन्हैया मध्ये अनिल कपूर बरोबर जोडी जमली.  "बेटा" सिनेमा आणि त्याची गाणी, प्रामुख्याने "धक धक करने लगा" या गाण्याने तर किती तरी जणांची धड धड वाढली. "साजन" चित्रपट हा प्रेक्षणीय आणि संगीतमय होता. उत्तम कथानकाच्या साथीला चांगले कलाकार, तिच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली. एकेक सिनेमे करत असताना सुभाष घईंचा "खलनायक" आला, "चोली के पीछे क्या" या गाण्याला लोकांनी काय कपडे घातलेत आणि खूप लाजिरवाणे नृत्य म्हणून नांवे ठेवली. हा सिनेमा तिला खूपच महत्वाचा ठरला. यानंतर जॅकी बरोबर १०० डेज, संगीत, सचिन दिग्दर्शित "प्रेम दिवाने" आले. तसेच संजय दत्त सोबत ठाणेदार, १९९४ मध्ये सुरज बडजात्यांचा "हम आपके है कौन" या चित्रपटाने तिच्या कारकिर्दीला चार चांद लागले. लगेच १९९७ ला यश चोप्रांच्या "दिल तो पागल है" संगीतमय सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. जर तिच्या सिनेमांची यादी करायची म्हटली तर खूप मोठी होईल. पण तिचे अजून काही चांगले रोल म्हणा किंवा सिनेमे आहेत, इलाका/प्रेमप्रतिज्ञा मिथुन बरोबर, अंजाम कोण विसरेल? लग्नानंतर केलेल्या देवदासचा पारोचा रोल केवळ लाजवाब.
कधी ती अभिनेत्री म्हणून तर कधी डान्सर म्हणून लक्षात राहिली. आपल्या सगळ्यांना तिचे काही गाणी डान्स जास्त आवडली ती म्हणजे, "तुमसे मिलके ऐसा लगा, हमको आज कल है इंतजार, बडा दुःख दिना तेरे लेखन ने, अठरा बरस की ते अगदी देवदास".
अशा या अभिनेत्रीला म्हणजेच " माधुरी दीक्षित" ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
१९६७ मध्ये अजून एका हॉलीवूड अभिनेत्रीचा जन्म झाला ती म्हणजे जुलिया रॉबर्ट्स. तिचं पण करिअर १९८७-९० या काळात सुरु झाले. मिस्टिक पिझ्झा, स्टील मॅग्नोलियास या सुरुवातीच्या चित्रपटानंतर १९९० मध्ये तिला भूमिका मिळाली ती "प्रेट्टी वुमन" ची. त्या भूमिकेचं जुलियाने सोन केलं. ती रातो रात स्टार झाली आणि मग एका पाठोपाठ एक माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग, एरिन, असे सुपर हिट सिनेमे दिले.
माधुरी आणि जुलिया या दोघींच्या बाबतीत हे साम्य. दोघीनींही मग काही काळ बॉलीवूड/हॉलिवूड वर राज्य केलं.

लेखन  - श्री मनोज करंदीकर