Friday, May 25, 2018

माझे मराठी आजोळ


मराठी नसले तरी माझे महाराष्ट्राशी एक अतूट नाते आहेतसे बघायला गेलं तर माझा जन्मही मुंबईतलाचमी स्वतःला मराठी कधीच मानले नाही पण माझी आई मराठी, मुंबईची असल्यामुळे, मी अर्धी मराठी आहे हे नाकारताही येत नाही. माझे आजोळ मुंबईमधले त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजोळी जाणं म्हणजे मुंबईला जाणे आणि आजी, आजोबा, मामा, मावशी यांच्याबरोबर मज्जा करणं. हे असे माझे आणि मुंबईचे नाते.
उन्हाळ्याच्या सुट्टीची आम्ही आतुरतेने वाट बघायचो. वार्षिक परीक्षा संपली की सुट्टीसाठी आजोळी मुंबईला जायचोगोवा- मुंबई ट्रेन च्या प्रवासात पण खूप मज्जा यायची. मामाची मुलं, मावशीची मुलं, माझी बहिण आणि मी असे सगळे एकत्र जमायचो. मामा आणि मावशी मुंबईतच राहात असल्यामुळे त्यांच्यासाठी मुंबईची नवलाई नव्हतीपण आमच्यासाठी मात्र मुंबई अनुभवण्याची नवलाई असायची.
मम्मी आणि मावशी बरोबर आम्ही खूप फिरायचो, नातेवाईकांकडे जायचो, एकूणच धम्माल करायचो.
बऱ्याच लोकांना सुट्टीसाठी त्यांच्या गावी जायला आवडते, पण गोव्याच्या एका छोट्याश्या गावात राहणाऱ्या आमच्यासाठी मात्र मुंबई सारख्या मोठ्या शहरात फिरणे हा एक वेगळा अनुभव होता. त्या लोकल्स, तो बाजार, ती गर्दी आणि मुख्य म्हणजे मराठी भाषा सगळेच आमच्यासाठी नवीन असायचे. गर्दीची सवय नसल्यामुळे मम्मीला आमच्यावर सारखे लक्ष ठेवायला लागायचे. गाडीत चढताना उतरताना आम्हांला मज्जा यायची पण मम्मीची मात्र तारांबळ उडायची. आम्ही कुठे हरवलो तर? या काळजीने ती सतत आमचा हात पकडून  ठेवायची. आमच्यासाठी हे सगळेच नवीन होते . लोकल्स मधले अनुभव पण वेगळेच होते.
त्याकाळी गोव्याला फार काही मिळायचे नाही त्यामुळे मम्मी बऱ्यापैकी खरेदी मुंबईला करायची. मावशीलाही खरेदी करायला खूप आवडायचे आणि त्या निमित्ताने आम्हांलाही खूप फिरायला मिळायचे.
मराठी बोलताना मात्र पंचाईत व्हायची.. मध्ये मध्ये कोकणी शब्द वापरत आम्ही मराठी  बोलायचा प्रयत्न करायचो. काही जण आमच्या मराठीला हसायचे, चिडवायचे, मस्करी करायचे त्यावेळी खूप वाईट वाटायचे. पण आजी आजोबा मात्र आमच्या या प्रयत्नांचे नेहमी कौतुक करायचे.
आजीला आम्ही मुंबईची आई म्हणायचो आणि आजोबांना सगळे अण्णा म्हणून हाक मारायचे. मुंबईच्या आईच्या हाताला एक वेगळीच चव होती. पन्हं हा प्रकार आमच्यासाठी नवीनच होता पण ती कालाखट्टा म्हणून पण एक पेय बनवायची  त्या कालाखट्टा मध्ये अशी काय जादू होती की मला ते खूप वडायचे, देवच जाणे. आमटी, भात, पोळी, भाजी... आणि गरम गरम भातावर वाढलेले तूप.... अहाहा...!!! आजही त्याचा सुगंध आणि स्वाद जिभेवर रेंगाळतो आहे. त्याच्या आठवणीने ही तोंडाला पाणी सुटतेमुंबईच्या आईच्या हातचे बेसनाचे लाडू म्हणजे अफलातून तसे लाडू मला त्यानंतर  आजपर्यंत कधीच चाखायला मिळालेले नाहीत. ती चव, तो खमंगपणा ... नाही माझ्या अजीसारखे बेसनाचे लाडू कुणालाच नाही बनवता येत आणि येणारही नाही. मला वाटतं ते लाडू बनवताना तिच्या हातातने प्रेम त्यात उतरत होते म्हणूनच त्याची चव अनोखी होती. आजी गेल्यानंतर मात्र मला तशी बेसनाच्या लाडवाची चव शोधून सुद्धा कधीच मिळाली नाही.
अण्णा, म्हणजे आजोबांच्या प्रेमाची रीत वेगळीच होती. छोट्या छोट्या गोष्टीत मज्जा कशी घ्यायची हे त्यांच्याकडून शिकावे.
आजीआजोबांनंतर मात्र माझे आजोळ संपल्यासारखे वाटले. मामाचे घर होते, अजूनही आहे, मावशीकडेही जायचो ...आजही जातो पण तिथे आजीआजोबांचे अस्तित्व नाही. आणि जिथे आजी आजोबा नाहीत ते आजोळ कसले? हो ना?
लहानपणीच्या आठवणी निघाल्या की माझे आजोळ माझ्या मनात जिवंत होते... जसे आज या लेखाच्या निमित्ताने झाले आणि पुन्हा एकदा मी नव्याने माझ्या आजोळच्या आठवणींमध्ये हरवून गेले.
माझे महाराष्ट्राशी पर्यायाने मराठीशी हे असे अनोखे नाते असूनही मी स्वतःला मराठी म्हणू शकत नाही पण आजोळच्या मराठीमायेची ऊब मला मिळाली हे ही तितकेच खरे...  
गोव्याची, कोकणी असल्याचा अभिमान आहेच मला आणि  तेवढ्याच अभिमानाने मी हे ही म्हणते...
'
नाही तरी अर्धी मराठी आहे मी'

                                   ---रुपाली मावजो किर्तनी
 

No comments:

Post a Comment