Saturday, January 30, 2021

तिळगुळ खा, निरोगी व्हा-----नम्रता चिटणीस

 

 

वर्षात येणाऱ्या १२ संक्रांती पैकी एक....मकर संक्रात...या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होऊन त्याचा उत्तर दिशेस प्रवास सुरु होतो. दिवस मोठे होऊ लागतात, तशी थंडी कमी होते. ऋतु बदलाचा हा सण बऱ्याच राज्यात साजरा केला जातो. लोहरी, बिहू , पोंगल, उत्तरायण, आशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.

 

मकर संक्रांत आणि तिळाचे समीकरण अगदी प्राचीन कालापासून आहे. घरोघरी केले जाणारे हळदी कुंकू, लहान मुलांचे केलेलं बोर नहाणं, ते अगदी नविन लग्न झालेल्या बायकांची पहिली संक्रात... सर्वात महत्त्वाचे स्थान तिळाचे! तिळाचे लाडू, तिळाची चिक्की, तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकऱ्या, असे वेगवेगळे पदार्थ करतात.

 

थंडीच्या महिन्यात आपल्या आहारात, सणा सुदीला सर्वत्रच तिळाचा वापर करतो! एवढयाश्या तिळाचे केवढे ते कौतुक?? तिळाच्या अनन्यसाधारण महत्वाचे कारण अर्थात वैज्ञानिक, त्याच बरोबर पौराणिक दृष्ट्या मिळते!

 

आरोग्यासाठी तिळ बहुमुल्य आहे. थंडीच्या दिवसात याचे रोज सेवन करावे असा आरोग्य तज्ञ सल्ला देतात. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, मँगनीज, जस्त, फोलेट, व्हिटॅमिन बी ६ हे सर्व घटक असतात. शिवाय उच्च प्रतिचे प्रथिन सुद्धा तिळा मध्ये आढळते. आयुर्वेदानुसार तिळाचे सेवन गूळा बरोबर केल्यास शरीराला आवश्यक उष्णता आणि ऊर्जा प्राप्त होऊन, मनुष्याच्या शरीराचे थंडी पासून रक्षण होते.

 

आयुर्वेदानुसार तिळाचे तेल वात आणि कफ दोष कमी करून, त्यांना नियंत्रीत ठेवते. स्वयंपाकासाठी तिळाचे तेल उत्तम तेल आहे. थंडीच्या दिवसात तिळाच्या तेलानी त्वचेची मालिश केली असता, त्वचा मृदु, मुलायम राहण्यास मदत होते. केसांसाच्या वाढीसाठी, अवेळी पांढऱ्या होणाऱ्या केसां करिता अत्यंत लाभदायक असे तिळाचे  आहे. त्या शिवाय बऱ्याच आयुर्वेदिक औषधां मध्ये पण तिळाच्या तेलाचा वापर केला जातो.

 

आता पुराणानुसार पाहता,  भगवान श्री विष्णुंचा घाम जेव्हा जमिनीवर पडला, तेव्हा तिळाचा उगम झाला. एका पौराणिक कथे प्रमाणे तिळाला साक्षात यमाचा आशिर्वाद लाभला आहे. म्हणूनच तिळ हे उत्तम, सुदृढ़ आयुष्याचे प्रतिक मानले जाते. मकर संक्रातिला केल्या जाणाऱ्या काळ्या तिळाच्या दानाला महादान असे म्हणतात.

 

बघा ना, आपल्या पुर्वापार चालत आलेल्या परंपरा विज्ञांनाशी किती निगडीत आहेत! आरोग्यासाठी उपयुक्त आशा तिळाचे सेवन करावे, आप्तेष्टांना वाटावे, गोर गरिबांना दान करावे, म्हणजे सर्वांनाच याचा लाभ मिळेल.

म्हणून तिळगुळ खा, निरोगी व्हा!

No comments:

Post a Comment