Monday, June 25, 2018

बालपण दे गा देवा

 
       मे महिन्याच्या "माझी माती "या विषयावर लिहिता लिहिताच  खरे तर बालपणी मैत्रिणी सोबत घालवलेल्या उन्हाळी सुट्टी, सुट्टीतील खेळ आणि पुढील वर्गाची शाळेची ओढ व तयारी या सर्वांना उजाळा दिला होता . आणि नेमके मंडळाकडून जून महिन्याचा बहरचा हा विषय वाचुन आनंद झाला. आणि वही पेन नकळत हातात कधी आले ते कळलेच नाही आणि शाळा, पाऊस, बालपण यावर लिहिण्यास उत्स्फूर्त झाले.
           खरं तर होळी खेळून झाल्यानंतरचे काही दिवस अभ्यासाचे असायचे कारण एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा असायची आणि परीक्षा संपते ना संपते तोच उन्हाळी सुट्टी कशी घालवायची याचे नियोजन असायचे. सवंगडी व बहीण भाऊ यांचे एकमेकासोबत घटकेत राग घटकेत लोभ असे असायचे. दुपारचे जेवण म्हणजे मस्त आईने केलेला स्वयंपाक व आंब्याचा रस सोबत कधी पापड कुरडया, कधी कांदा भजी, कधी बटाटा वडा यावर ताव मारून झाल्यावर घरात पत्ते, सागरगोटी, कॅरम आणि सापशिडी असे खेळ ठरलेले आणि संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर कंचे, गिल्लीदांडू असे खेळ आणि त्यात खूप भांडणे पण व्हायची. बरेचदा रात्री लाईट गेल्यावर लपाछपी चा खेळ व्हायचाच. संपूर्ण लोक बाहेर गप्पा मारत रस्त्यावर उभे राहायचे. कुल्फी आणि ऊसाचा रस याची एकत्र जमुन खाण्याची मज्जा आता कधी ही मिळणार नाही.
       मी अगदी २/३ वर्गात असतांना उन्हापासुन रक्षण करण्यासाठी कूलर नसुन घराच्या मागच्या व पुढच्या दरवाज्याला वाळ्याच्या ताटया लावायचो आणि त्यावर थोड्या थोड्या वेळाने पाणी टाकुन ओल्या ठेवायचे काम माझ्याकडे होते. उन्हाळ्यात रात्रीचे सर्व लोक बाहेर अंगणात किंवा माडीवर झोपायचे. आमचे काका रोज गोष्ट सांगायचे. भुताची गोष्ट सांगायला सुरुवात होताच अर्धी बालगोपाल मंडळी पळुन जायची.              
      उन्हाळ्यात २/३ अंगत पंगत आणि सर्व काकू मिळुन सर्कसला जाणं हा तरं फार मोठा कार्यक्रम असायचा. तिकडे भेळ, खारे दाणे  खाल्लेलेची चव अजूनही जिभेवर आहे .आणि या सगळ्यात मे महिन्याची सुट्टी कधी संपायची ते कळतच नसे. एक पाऊस पडला की शाळेची आठवण व्हायची आणि नविन वर्गाच्या तयारीला सुरुवात होत असे. आमचे शाळेचे दप्तर कापडाचे  शिवलेले असायचे, नविन डब्बा, पाण्याची बाटली, शाळेची वह्या पुस्तके सर्व वस्तु संपूर्ण कॉलनीत दाखवायचो. एकुलती एक असल्याने बहीण भाऊचे कपडे व इतर काही कधीच वापरावे लागले नाही
           चौथी पर्यन्त शाळेत रिक्षाने जायचे, रिक्षा वाले काका खूप प्रेमळ व काळजी घेणारे होते. डब्यातील कधी भाजी पोळी, गुळ पोळी पुरी लोणचे भाजी किंवा साखर आंबा  गुळ आंबा पोळी मैत्रिणी सोबत एकत्र बसून खाण्याची मज्जा काही निराळीच होती.
           प्राथमिक शाळा संपली आणि ५ वी त दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला आणि तिकडे शाळे बाहेर फेरीवाले असायचे. वाफळलेल्या शेंगा, बोरं आणि खारे दाणे घरी न सांगता खायचो आणि वर घरी जाऊन ओरडा पण खायचोआई ला कसे कळायचे कोण जाणे. आमच्या गावात नदी वैगरे नव्हती त्यामुळे साचलेले पावसाच्या पाण्याच्या डबक्यात उड्या मारत मारत पावसात चिंब ओले होत घरी येण्याची मज्जा अवर्णनीयच .कधी एखाद्या  मैत्रिणी ला ५०पैसे किंवा एखादा रुपया  दिला तरं तिच्याकडुन परत मिळेपर्यन्त तिला आठवण करून दिल्याचे आठवले की आता हसू येते.
            शाळेत जातांना खिशात मुरमुरे फुटणे दाणे भरून न्यायचे आणि खात खात शाळेत जायचो परत येतांना ठरलेल्या चिंचेच्या झाडा वरून चिंचा पाडून त्या खात खात घरी परत यायचो.
             ५ते८ च्या बागडे बाई खूप प्रेमळ आणि संस्कृतच्या बाई खूप चिडक्या व खडूस होत्या. त्यांना आम्ही कुकरची शिट्टी म्हणायचो
        आठवीत असतांना एका मैत्रिणीच्या पायावरून बस मध्ये गर्दी असल्याने चढता न आल्याने सरकारी बसचे चाक जाऊन तिला कायमचे अपंगत्व आले होते ही घटना डोळ्या समोर घडल्याने ही घटना विसरणे अशक्यच.
        आठवीत शिंग फुटले आणि मग कोणत्याही नविन मुलीला आपल्या ग्रुप मध्ये येऊ न देणे ,कोणी येण्याचा प्रयत्न केला तरं तिला बाहेर काढणे, तिला बाजुला घेऊन दम देणे मागच्या बाकावर बसुन  बाईचा तास सुरू असताना चुपचाप डब्बा खाणे अशी कामे देखील केली.
           दहावीत फर्स्ट क्लास मध्ये पास झाल्यावर बाबांनी घेऊन दिलेले घड्याळ अजून मी जपून ठेवलंय. कधी कधी असे वाटते परत एकदा बालपण उपभोगता आले तर मज्जा येईल.
बालपण वर एखादे पुस्तक पण लिहू शकते ,पण म्हणतात ना थोडक्यात गोडी  !!
   परमेश्वरला लहानपण दे गा देवा म्हणत बालपणी च्या आंबट गोड ,खारट तुरट अश्या आठवणींना उजळून काढत आत्ता पुरती इथेच थांबते ....

    


सौ .निहारिक सचिन सावरकर

 
 
 
 

                          

No comments:

Post a Comment